Thursday 19 May 2011


गोष्ट‘डुक्करमाशा’ची!Print
अभिजित घोरपडे ,गुरुवार, २८ एप्रिल २०११
abhighorpade@gmail.com
स्थानिक माशांना हद्दपार करून चिलापी ऊर्फ डुक्करमाशाने आपल्याकडील नद्या व तलावांचा ताबा घेतला आहे. भीमा नदीवरील उजनी धरणात मिळणाऱ्या माशांपैकी ९५ टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाण याच माशाचे असते. त्यामुळे जलचरांची विविधता नष्ट झालीच आहे, शिवाय इतरही परिणाम भोगावे लागत आहेत.. ‘कानामागून येऊन तिखट झालेल्या’ या माशाची गोष्ट रंजक आहे आणि बरेच काही शिकवणारी सुद्धा!
‘साहेब, आता इथं दुसरा मासाच बघायला मिळत नाही, सापडतो तो फक्त चिलापी! धरणात लावलेलं जाळं बाहेर काढलं, की त्यात चिलापीच असतो, उगाच कुठं चार-दोन इतर मासे मिळतात’. भीमा नदीवरील उजनी धरणात काही दशकांपासून मासेमारी करणारा मच्छीमार सांगत होता. त्याच्या सांगण्यात एका शब्दाचीही काहीही अतिशयोक्ती नव्हती. कारण हे मासे ज्या भिगवण, इंदापूर बाजारात जातात, तिथेसुद्धा हेच चित्र पाहायला मिळाले. दोन-पाच टक्के इतर मासे नाही, तर सारी चिलापी! या धरणाच्या क्षेत्रात असणाऱ्या इंदापूर, भिगवण, करमाळा व आसपासच्या बाजारपेठेतून मिळणारी मासे उत्पादनाची आकडेवारीसुद्धा या माहितीला पुष्टीच देते. उन्हाळय़ाच्या दिवसात दररोज मिळणाऱ्या ४०-५० टन माशांमध्ये ९५ टक्क्यांपेक्षा जास्त असतो तो चिलापीच. उरलेल्या दोन-पाच टक्क्यांमध्ये असतात रोहू, कटला, मरळ, वाम अशा जाती! या जाती पाहायला तरी मिळतात, पण परंपरागतरीत्या आढळणारे आहेर, खद्री यांसारखे मासे तर येथून इतिहासजमा झाले आहेत.
हे चित्र केवळ भीमा नदीतीलच नाही, तर महाराष्ट्रातील (आणि देशातीलसुद्धा) बहुतांश नद्या व धरणांमध्ये चिलापीची घुसखोरी झाली आहे. कोल्हापूरजवळ उगम पावणाऱ्या पंचगंगा नदीतही तो आहे. पंचगंगा व कृष्णेच्या संगमाजवळ असलेल्या तेरवाड बंधाऱ्याजवळही मासेमार हाच अनुभव सांगतात. तिथल्या अतिप्रदूषित पाण्यात आता केवळ हा एकाच प्रकारचा मासा सापडतो. आधी   म्हणजे दहा-पंधरा वर्षांपूर्वी तिथे पंधरा-वीस जातींचे मासे मोठय़ा प्रमाणात मिळायचे, पण आता एकटा चिलापी तिथे टिकून आहे. अतिशय दरुगधीयुक्त व घाणेरडय़ा पाण्यात राहणाऱ्या या माशाला स्थानिक मासेमारांनी नाव दिले आहे- डुक्करमासा! या डुक्करमाशाने आपल्याकडील नद्यांचा ताबा घेतला आणि त्याच्या जोडीनेच आपल्या स्थानिक जाती नष्ट होत गेल्या. अगदी शेकडो-हजारो वर्षांपासून पाहायला मिळणाऱ्या स्थानिक माशांच्या जातींना मागे टाकून त्यांची जागा चिलापीने घेतली. मुख्यत: पंधरा-वीस वर्षांमध्ये दिसलेला हा बदल. त्याची सुरुवात आधीपासूनच झाली, पण दर्शनी स्वरूप लाभले ते दोन दशकांमध्ये. विशेष म्हणजे याच काळात नद्यासुद्धा प्रदूषित होत गेल्या. हा बदलही या डुक्करमाशाच्या पथ्यावरच पडला. स्थानिक माशांना हद्दपार करणारा हा मासा आपल्याकडे आला कसा, रुजला कसा, याची कथा अतिशय रंजक आहे आणि बरेच काही शिकवणारीसुद्धा! पण हा चिलापी म्हणजे नेमका काय प्रकार आहे?
आपल्या संदर्भात सांगायचे तर त्याची कथा आहे गेल्या साठ वर्षांमधील. त्याचे मूळ नाव ‘तिलापिया मोझांबिकस’ किंवा ‘ओरेक्रोमिस मोझांबिकस’. या तिलापियाचा अपभ्रंश होऊन आपल्याकडे तो बनला चिलापी. भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा चिलापी महाराष्ट्रातच काय, पण संपूर्ण देशातही अस्तित्वात नव्हता. कारण तो मूळचा आपल्याकडील नाहीच. त्याचे मूळ स्थान आहे- आफ्रिकेच्या दक्षिणेकडील म्हणजेच मोझांबिक, झिम्बाब्वे, स्वाझिलँड,बोत्सवाना या देशांमधील. परिसराशी उत्तम प्रकारे कसे जुळवून घ्यावे हे शिकावे याच माशाकडून! अतिशय खडतर परिस्थितीत तो तग धरू शकतो. त्यामुळे एकदा का तो एखाद्या नदीत किंवा जलाशयात शिरला, की त्याला तिथून हटविणे मुश्कील, अगदी चिवट तणाप्रमाणे! त्याला कारणही तसेच आहे. उत्क्रांत होत असताना या माशाला काही भन्नाट गुणधर्म लाभले आहेत.  तो गोडय़ा पाण्यात राहू शकतो, तसाच मचूळ आणि अगदी खाऱ्या पाण्यातसुद्धा! इतकेच नव्हे तर तो साध्या पाण्याप्रमाणेच बऱ्यापैकी आम्लयुक्त आणि अल्कलीयुक्त पाण्यातही जगू शकतो. प्रदूषणाचेही त्याला वावडे नसते. पाण्याचे जैविक प्रदूषण असू द्या नाहीतर रासायनिक, त्यातूनही तो मार्ग काढू शकतो. पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले की मासे व इतर जलचर तेथून स्थलांतर करतात किंवा ते शक्य नसेल तर मरायला सुरुवात होते. चिलापी मात्र ही स्थिती पचवूनही टिकून राहतो. त्याला खाण्याचेही वावडे नसते. त्याबाबतीत तो सर्वहारी उंदराचाच भाऊ! मुख्यत: पाण्यातील शेवाळ खातोच,पण गरज पडली तर पाणवनस्पती व इतर माशांची अंडीसुद्धा मटकावतो.
याच्या पलीकडेही त्याची वैशिष्टय़े आहेत. ती त्याच्या पथ्यावर पडतातच, पण इतर माशांना त्रासदायक ठरतात. याची उत्पादनक्षमता अफाट आहे. काही अभ्यासांमध्ये असे दिसून आले आहे, की एका तळय़ात बोटाएवढय़ा आकाराची बारा-चौदा पिले सोडली तर तिथे एक-दीड महिन्यात त्यांची संख्या तीन हजार बनली, तर अडीच महिन्यांमध्ये ती १४ हजारांवर पोहोचली. म्हणजे तळय़ात एकदा माशाचे बीज सोडले की पुन्हा टाकायची अजिबात गरज नसते. त्याची संख्या वाढली, की अर्थातच इतर माशांच्या संख्येवर विपरीत परिणाम होतोच. हा मासा आपली अंडी तोंडात घेऊन फिरतो. त्याच्यामुळे पिले बाहेर पडेपर्यंत त्यांना संरक्षण मिळते. या माशाची आणखी एक खोड म्हणजे तो पुनरुत्पादनासाठी नदीचा, धरणाचा तळ ढवळतो. त्यामुळे पाणी मोठय़ा प्रमाणात गढूळ होते. ते इतर माशांसाठी व वनस्पतींसाठीसुद्धा हानिकारक ठरते.. एक ना दोन, अशा याच्या नाना तऱ्हा! म्हणूनच तो कुठल्याही पाण्यात शिरला की तिथला ताबाच घेतो.
आता प्रश्न उरतो हा आपल्याकडे आला कसा? त्याला कारणीभूत आहे त्याचे आणखी एक वैशिष्टय़. ते म्हणजे याची वाढ अतिशय वेगाने होते, अगदी ब्रॉयलर कोंबडय़ांप्रमाणे. त्यामुळेच त्याला ‘अ‍ॅक्व्ॉटिक चिकन’ असेही म्हटले जाते. त्यामुळे मासेमारीचे उत्पादन वाढविण्यासाठी तो आपल्याकडे १९५२ मध्ये आणण्यात आला. सुरुवातीला तो बंदिस्त तळय़ांमध्ये सोडण्यात आला, पण तिथून सुटून तो हळूहळू सर्व नद्यांमध्ये शिरला आणि शिरला तो कायमचाच! उत्पादन वाढते म्हणून सुरुवातीला तो उपयुक्त ठरला, त्याचा हा फायदा आजही आहे. पण त्याचे दुष्परिणामही आता चांगलेच जाणवू लागले आहेत. इतर माशांना हद्दपार व्हावे लागत असल्याने त्याच्यामुळे पाण्यातील जैवविविधता नष्ट होत गेली. याची उदाहरणे महाराष्ट्राप्रमाणेच भारत, तसेच श्रीलंका, ऑस्ट्रेलियासारख्या देशांतही त्यांच्यामुळे स्थानिक मासे संपले आहेत. आफ्रिका खंडाच्या दक्षिण कोपऱ्यात वावरणारा हा मासा आता जगाभरातील ९० पेक्षा अधिक देशांमध्ये पसरला आणि स्थिरावलासुद्धा आहे. तेच महाराष्ट्रातही पाहायला मिळत आहे. विविधता तर गेलीच, स्थानिक जातीसुद्धा नष्ट झाल्या आणि वाढला तो चिलापी! उजनी धरणाचेच उदाहरण द्यायचे तर तिथून नष्ट झालेल्या आहेर-खद्री या जातींप्रमाणेच झिंगे, मरळ, वाम या जातीसुद्धा अपवादानेच पाहायला मिळतात. तिकडे पंचगंगा नदीत तेरवाड बंधाऱ्याजवळ माशांच्या शेंगाळो, मरळ, वडसुडा, तांबर, घुगरा, परग, वाम, कटारना, आंबळी, खवली, तांबुडका, अरळी, कानस, डोक ऱ्या अशा चौदा-पंधरा जाती सहजी मिळायच्या. पण आता यापैकी एकही मासा दिसला तरी नवल!
चिलापी वाढण्यास नद्यांचे प्रदूषणही कारणीभूत ठरले आहे. प्रदूषित पाण्यामुळे स्थानिक मासे आधीच टिकून राहण्यासाठी धडपडत होते. याशिवाय मासेमारीत जास्तीत जास्त उत्पादन मिळविण्यासाठी होत असलेली बेशिस्त आणखी त्रासदायक ठरलीच होती. त्यात भर म्हणजे चिलापीमुळे त्यांच्या अस्तित्वासाठीच स्पर्धा निर्माण झाली. ही स्पर्धा इतर जातींचे मासे हरल्यात जमा आहेत. चिलापीचा माणसावरही अप्रत्यक्ष परिणाम होतच आहे. माशांच्या इतर जाती नष्ट झाल्यामुळे अनेक भागांत मासेमारांच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम झाला आहे. हा मासा प्रदूषित पाण्यात वाढतो खरा, पण त्याचा खाणाऱ्याला त्रास आहे. कारण हा मासा प्रदूषित पाण्यात टिकतो म्हणजे प्रदूषित घटक त्याच्या शरीरात गेले तरी त्याला काही होत नाही, पण अगदी जड धातूसारखे अतिशय घातक घटक काही प्रमाणात त्याच्या शरीरात साठून राहतात. माणूस किवा इतर पक्षी-प्राणी या माशाला खातात तेव्हा त्यांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे काही अभ्यासक असे सांगतात, की प्रदूषणामुळे मासे मेलेले परवडले, पण ते जिवंत राहिले तर त्याचा माणसाला त्रास होऊ शकतो.
गेल्या वीस वर्षांमध्ये झालेला हा बदल स्थानिक जिवांच्या विविधतेवर खोलवर परिणाम करणारा आहे. त्यातून शिकण्यासारखेही बरेच आहे. एखाद्या प्रदेशात कोणत्याही जिवाची नवी जात आणताना त्याच्या परिणामांचा पूर्ण अभ्यास झालेला नसेल तर काय होऊ शकते, याचे हे उत्तम उदाहरण! तो आणला उत्पादन वाढविण्यासाठी पण त्याच्यामुळे भलतेच घडले. गाजरगवत, घाणेरी यांसारख्या तणांच्या रूपाने आपण जमिनीवर हे घडलेले पाहिलेच आहे. आता पाण्यातही चिलापीच्या रूपाने ‘तण’च वाढत आहे. त्यामुळे असा खेळ खेळायचाच, तर अतिशय काळजीपूर्वक खेळावा लागतो. नाहीतर उपायापेक्षा इलाज भयंकर ठरतो. तेच चिलापी ऊर्फ डुक्करमाशाने दाखवून दिले आहे.

No comments:

Post a Comment